Article by - श्रीपाद कुळकर्णी, व्यावसायिक, रोटरी क्लब-माजी अध्यक्ष डोंबिवली Loksatta - http://t.co/8aCetCg
सरदारजीवर अनेक विनोद केले जातात, पुण्याच्या दरवाजावरील पाटय़ांवर विनोद केले जातात.तसेच चुटके आता कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कारभारावर करण्याची वेळ आली आहे. कारण दोष कुणाचा? लोकप्रतिनिधींचा तर अजिबात नाही. कारण आम्ही मतदारांनीच त्यांना निवडून दिलेले असते. त्यामुळे ते बिच्चारे त्यांच्या पध्दतीने काम करीत असतात. त्यात हस्तक्षेप करण्याचा आम्हा मतदार नागरिकांना अजिबात अधिकार नाही. कारण आम्हीच मतदारांनी त्यांना मतदान केलेले असते. मग मतदार नागरिकांचा दोष आहे का? तर त्याहून अजिबात नाही. कारण ते पण बिच्चारे सात सत्तावन, आठ बावन करीत मेंढरासारखे सकाळी लोकल पकडून मुंबईत जातात आणि संध्याकाळचे तशाच लोकल पकडून कल्याण-डोंबिवली शहरात फक्त निवासासाठी येतात. मतदार नागरिक हा सकाळी सहा ते रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत आपल्या पोटाच्या खळगीसाठी मुंबई परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त अडकून पडलेला असतो. तो जर आपले नगरसेवक काय करतात, आपले मत सत्कार्मी लागले का म्हणून ‘वॉच’ ठेवण्यासाठी स्वत:च्या नोकरीला दांडय़ा मारून घरी बसू लागला तर एक दिवस त्या बिच्चाऱ्यावर अॅल्युमिनियमचा ‘वाडगा’ हातात घेऊन फिरण्याची वेळ येईल. हा चाकरमानी माणूस हुशार आहे. त्यामुळे मतदान केले की तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करतो, असे समजून आपल्या घरगाडय़ात गुरफटून गेलेला असतो. घरात तुळस असते, पण त्या लोकलच्या टाईम टु टाईममुळे तिला बिच्चारीला कधी पाणी पण घालायला वेळ नसतो. त्यामुळे लोकांनी रस्त्यावर झाडे लावून त्याचे संगोपन करावे वैगरे भाषणात ठीक, पण लोकप्रतिनिधी नियमित हे उपक्रम राबवितात का? तर पाऊस सुरू झाल्यावर, त्यानंतर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला. एकदा ती रोपं खड्डय़ात लावली का ती खड्डय़ातून वर आलेत की त्यांना पालवी फुटले की त्यांना कोणी पाणी टाकतंय याचा कधीच कोणी विचार करीत नाही. वृक्षारोपणापुरता पैशांचा थोडा चुराडा केला जातो. आमचा नगरसेवक, लोकप्रतिनिधी शहरासाठी काहीतरी करतो, एवढा देखावा आमच्या मनाला त्यावेळी थोडा सुख देऊन जातो. आता डोंबिवली हिरवीगार होणार.असे चित्र उभे केले जाते. पण ऑक्टोबर हिटच्या तडाख्यानेच आम्ही घाम पुसून गारेगार होऊन जातो तिथे हिरवेगारचा काय प्रश्न?



